आमच्या साधकांबरोबर “विश्वगांधार’ नावाचं पुस्तक त्यांना वाचून दाखवत होतो.हे पुस्तक समर्थ रामदासांच्या “दासबोधा’प्रमाणे आहे. म्हटलं तर आध्यात्मिक, म्हटलं तर सांसारिक किंवा व्यावहारिक. तसंही ओशो म्हणतात, “संन्यास आणि संसार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संसार करा पण फक्त “मी, माझा’ करू नका- एवढंच’ तर या पुस्तकात माणसं कशी ओळखायची हे उदाहरण देत देत शिकवलं आहे. केवळ वाणीनं बोलतो किंवा कपडे घालतो म्हणून कोणी माणूस होत नाही. तर वागण्या-बोलण्यानंच प्रत्येकाला आपण दानव आहोत, मानव आहोत की देव आहोत ते प्रत्येकवेळी, प्रत्येक प्रसंगात अन् प्रत्येकासमोर सिद्ध करावं लागतं.
त्यातलाच एक ओळखण्याचा प्रकार सिंह या प्राण्यावरून कोणी सिंह असतात आणि त्यांना स्वतःला हे माहीत असते. उदा. श्रीकृष्ण, आर्य चाणक्य, लो. टिळक, रामकृष्ण परमहंस. या महापुरुषांनंतर आपणही स्वतः सिंहच आहोत अशा भ्रमात वावरणारे लोक आणि सिंहाचे कातडे पांघरणारे लोक त्यांनाच आपण “कागदी सिंह’ म्हणत आहोत. आचार्य अत्रे त्यांच्याबाबत म्हणाले होते, “या जगात फार छोटी छोटी माणसे मोठ्या मोठ्या खुर्चीवर बसलेली दिसतात.’ पण परिस्थिती त्यांना योग्य वेळ येताच चिरडून टाकतेच. काहीजण आपण देशभक्त, समाजसुधारक, सत्पुरुष व सज्जन असे कातडे पांघरून आपलं लांडग्याचं रूप झाकण्याचा प्रयत्न करत असतात. पण एखाद्या प्रामाणिक व्यक्तीची नजर त्यांच्यावर गेल्यानंतर तो त्यांचं कातडं ओरबाडून त्यांना उघडं करतो आणि त्याचे कोल्हा, लांडगा किंवा गाढवाचे खरे रूप बाहेर येते.आणि समजा प्रामाणिक व्यक्ती भेटली नाही तर नकळत तेच आपल्याला त्यांचं खरं रूप दाखवतात. परिस्थितीच त्यांना ते उघड करण्यास भाग पाडते.
मोठ्यांच्या ओळखी सांगून आपली कामं साधणे, येनकेन प्रकारेन मोठ्यांच्या नजरेत भरण्यासाठी पुढे पुढे करणे. थोडीशीच मदत करून भरपूर गवगवा करणे मोठमोठ्याने आपले कर्तृत्व बोलून दाखवणे, इतरांच्या छोट्या चुका मोठ्या करून सांगणे, आपणच कसे योग्य होतो हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे अशी अनेक माणसे आज आपण सभोवताली पाहात आहोत. (फेसबुक किंवा व्हॉट्सऍप पाहणाऱ्या प्रत्येकाला हे कळेल.) सामान्य कार्यकर्ता मोठ्या पदावर जातो, पेपर टाकणारा मुलगा वृत्तपत्रात मोठा संपादक होतो, चहा देणारा मुलगा चित्रपटात काम करू लागतो. अनेक क्षेत्रातली धडपडणारी लहान माणसं योग्य गुरू भेटल्यावर मोठमोठी कामं करताना दिसतात. सगळ्यात शेवटी सिंह नसलेले आणि ते माहीत असलेले सामान्य लोक येतात. हा खरं तर त्यांच्यातला असमान्यपणाच असतो. खोटे कातडे पांघरून दिवस ढकलत राहण्याची त्यांची हिंमत नसते आणि सामान्य राहण्याची मानसिक तयारीही असते.त्यामुळे सामान्य, स्वतःला ओळखणारे किंवा चार दिवस पण सिंहासारखं जगणारे या दोन्ही प्रकारच्या माणसांची जगताना पंचाईत होत नाही. खरी पंचाईत होते ती फक्त कागदी सिंहांची. सिंहपणा हवा असेल तर म्हातारपणी शिकार न करता आल्यानं उपासानं मरावं लागतं आणि तरुणपणातही शिकार करून जगावं लागतं. म्हणून एकतर सिंह तरी व्हा किंवा आपल्यातला सामान्यपणा मान्य करा.
सहजानंद