पोर्ट ऑफ स्पेन – कर्णधार विराट कोहलीने लागोपाठ दुसरे शतक टोलविले, त्यामुळेच भारताने वेस्ट इंडिजविरूद्धचा तिसरा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 6 गडी व 15 चेंडू बाकी राखून जिंकला आणि या दोन संघांमधील तीन सामन्यांच्या मालिकेतही 2-0 असा विजय मिळविला. मात्र या सामन्यात ऋषभ पंत अपयशी ठरला. त्यामुळे सामन्यानंतर सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून ऋषभ पंतवर टीका झाली आहे.
विजयासाठी धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा हा पुन्हा अपयशी ठरला. तो 10 धावांवर धावबाद झाल्यानंतर शिखर धवन (5 चौकारांसह 36) याच्या साथीत कोहलीने 66 धावांची भागीदारी केली.
धवनच्या जागी आलेल्या ऋषभ पंत (0) याने लगेचच तंबूचा रस्ता धरला. त्याने फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर निष्काळजीपणे फटका मारून विकेट फेकली. समाजमाध्यमांकडून पंत याच्यावर कडाडून टीका झाली आहे. महेंद्रसिंगचा वारसदार होण्याची क्षमता त्याच्याकडे नाही, त्याने आठव्या क्रमांकावरच खेळावयास येणे सोयीचे आहे आदी अनेक टीका त्याच्यावर झाली.