मुंबई : भाजपच्या नेत्या मागील काही दिवसांपासून चर्चेत येत आहेत. दरम्यान, त्यांनी नुकतेच त्यांच्या राजकीय घडामोडीवरून होत असलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावरही मत मांडले आहे.
यावेळी पंकजा मुंडेंना तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? असा सवाल करण्यात आला. यावर त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, “राजकारण कसं असतं, त्यात सर्व गोष्टींचं व्यवस्थित मिश्रण पाहिजे. जसं चहामध्ये चहापत्ती, साखर, थोडी विलायची, थोडं सुंठ किंवा आद्रक टाकली पाहिजे. कोणी दालचिनी टाकतं. ते मिश्रण परफेक्ट झालं तर चहा परफेक्ट बनतो. एखादा दुसरा पदार्थ बनवणं सोपं, पण चहा बनवणं इतकं सोपं नाही. हेच राजकारण आणि चहातील साम्य आहे.”
चहात चहापावडर पडली तर तो कडवट होतो. तुमच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून कोणी चहापत्ती जास्त टाकतंय का? या प्रश्नांवरही पंकजा मुंडेंनी उत्तर दिले. “मला स्ट्राँग चहा आवडतो. चहा चहा आहे, तो दुधासारखा कसा प्यायचा. त्यामुळे मला थोडा स्ट्राँग चहा आवडतो. जे आपल्या वाट्याला येतं त्याची चव आपल्यासारखी बदलून घ्यावी लागते,” असे मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “ताटात काही चांगलं पडलं नाही, तर मी किरकिर करत नाही. मीठ कमी असेल तर लोणचं तोंडी लावते. तिखट कमी असेल तर चटणी खाते. तसंच जीवनातही काही कमी पडलं , तर त्याची चव कशी व्यवस्थित करायची हे मला माहिती आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.