औरंगाबादः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत होत्या. अखेर पंकजा मुंडेंनी आज यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.
”तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही”, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
औरंगाबादमध्ये त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. “कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच”, असेही पंकजा मुंडेंनी अधोरेखित केले.
दरम्यान, रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर राज्यात एकच गोंधळ उडाला होता. विरोधकांनी राज्यभरात आंदोलने केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता मागे पडले असल्याचे म्हटले जात आहे.