औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून भाजपनेत्या पंकजा मुंडे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त येत आहेत. फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना पंकजा यांनी मुद्दाम निर्धारित दौऱ्यातून माघार घेतल्याचं बोललं जात होतं. आता पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. त्या औरंगाबाद येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलत होत्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही रोज उठताबसता जात काढत होता. त्याच मुख्यमंत्र्यांने मराठा समाजाला आरक्षण दिलं, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विधानामुळे पंकजा आणि फडणवीस यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सध्या बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कुणी उपस्थित केला की, तिकडे षडयंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाच मुद्दा काढतात. मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाचं काम तुम्हीचं केलं. ज्या मुख्यमंत्र्यांची जात तुम्ही काढत होतात त्यांनीच मराठा समाजला आरक्षण दिलं. मात्र, या सरकारने ते आरक्षणही संपुष्टात आणलं, असा घणाघात पंकजा यांनी केला.