भक्तीमय वातावरणात नीरा नदीत पादुकांना स्नान
नीरा- पंढरपूरहून आंळदीकडे निघालेला पांडुरंगाचा पालखी सोहळ्याने रविवारी (दि. 17) पुणे जिल्हात पोहोचला आहे. सकाळी पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातल्यानंतर या सोहळ्याचे नीरा येथे आगमन झाले. नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांच्यासह भाविकांनी या सोहळ्याचे स्वागत केले.
पंढरपूरच्या पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला पांडुरंगाच्या पादुका आळंदीला घेऊन जाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष पांडुरंग समाधी सोहळ्यासाठी हजार असतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. वासकरांचे म्हणणे मागील काळात विठ्ठल मंदिर समितीने मान्य करुन सोहळा सुरु केला असल्याचे विठ्ठलराव (दादासाहेब) वासकर महाराज यांनी सांगितले. यावर्षी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे 15 तर रथा मागे 10 दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या वारीत सहभागी झाले आहेत. सुमारे 16 हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती सोहळा प्रमुख गोपाळ महाराज देशमुख यांनी दिली.
कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपूर येथुन निघाला आहे. अष्टमीला आळंदीला दाखल होणार आहे. सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील मक्काम आटपून सकाळी लोणंद येथे न्याहारी घेऊन दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीतील प्रसिद्ध दत्तघाटावर सकाळी आठ वाजता दाखल झाला. यावेळी रथातील पालखी दत्त मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीतील पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थात स्नान घालण्यात आले. दत्त मंदिराचे पुरोहीत सचिन घोडके यांनी पादुकांचे स्वागत केले. नदीकिनारी असलेल्या पालखी तळावर विसावा घेतला दुपारी 2 वाजता हा सोहळा वाल्हे येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. सोहळ्याचे दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैद्यकिय सेवा पुरवली.