-माधव विद्वांस
चित्रपट व नाट्य अभिनेते तसेच गायक पंडितराव नगरकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर. त्यांचे वडील त्यांना पंडित या टोपण नावाने हाक मारीत, त्याच नावाने ते पुढे ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म 26 डिसेंबर, 1910 रोजी नगर जिल्ह्यातील भातवडी-पारगाव या खेड्यात झाला, तर बालपण मुंबईला, गिरगावात गेले. ते सुखवस्तू कुटुंबात जन्मले होते. त्यांचे वडील एका व्यापारी पिढीचे भागीदार होते. त्यांचे शिक्षण गिरगावच्या आंग्रेवाडीतील आर्यन शाळेत झाले. त्यांना खेळ व व्यायाम याच्याबरोबर नाटक व सिनेमाचीही आवड होती.
एकदा अभिनेते व गायक विष्णुपंत पागनीस यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि त्यांच्यातील गायक ओळखला. त्यांनी त्यांना गाण्याची तालीम देण्यास सुरुवात केली. शाळेच्या संमेलनातील गायन
स्पर्धेत “सत्तेचे गुलाम’ या नाटकातील पद त्यांनी बापूराव पेंढारकरांच्या पद्धतीने गाऊन वाहवा मिळविली व बक्षीसही मिळविले. या प्रसंगाने त्यांच्यातील गायक उत्तेजित झाला. त्यांचे शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले व मॅट्रिकच्या परीक्षेला दोन-तीन महिने असताना त्यांनी शाळेला रामराम केला.
वर्ष 1929 मध्ये पंडितरावांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांनी चरितार्थासाठी शास्त्रीय संगीताच्या मैफली करण्यास सुरुवात केली. भारत गायन समाजाचे बापूराव केतकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. सवाई गंधर्व, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मिराशीबुवा इत्यादी मान्यवर गायकांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यावेळी गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकांना विशेष मागणी असायची. त्यांचा चांगला आवाज पाहून ओडियन रेकॉर्ड कंपनीने त्यांच्या “जी. पी. नगरकर’ या नावाने आठ ध्वनिमुद्रिका वर्ष 1930 मध्ये प्रसिद्ध केल्या. त्यातील “जाके मथुरा’ या गाण्याने फार लोकप्रियता मिळविली आणि पंडितराव “जाके मथुरा नगरकर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
यानंतर त्यांच्या गायक म्हणून कारकिर्दीला खरी सुरुवात झाली. “रामरंगी रंगले मन’ या संगीत तुलसीदास नाटकातील गीताची ध्वनिमुद्रिकाही खूप लोकप्रिय झाली होती. हरिभाऊ शुक्ल यांच्या “मंगला’ या नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. याच सुमारास पंडितरावांचा परिचय “संशयकल्लोळ’ नाटकात रेवतीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना पालकर यांच्याशी झाला. त्यानंतर पंडितराव “संशयकल्लोळ’मध्ये अश्विन शेठचे काम करू लागले. पुढे पंडितराव व सुलोचना यांनी वर्ष 1934 मध्ये “सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली.
मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इत्यादी नाटकेही रंगमंचावर आणली. 1937 मध्ये ही कंपनी बंद पडली. वर्ष 1939 मध्ये “मायाबाजार’ या मराठी चित्रपटात पंडितरावांनी भूमिका केली व संगीत दिग्दर्शनही केले. वर्ष 1951 मध्ये व्ही. शांताराम यांच्या “अमर भूपाळी’ या चित्रपटात त्यांनी केलेली “शाहीर होनाजी’ यांची भूमिका आणि लता मंगेशकरांबरोबर गायलेल्या “घनश्याम सुंदरा’ या भूपाळीने पंडितराव महाराष्ट्रातल्या घराघरांत खऱ्या अर्थाने पोहोचले व ते गीत श्रोते आजही कान देऊन ऐकतात.
शेवटी 1976 मध्ये रांगणेकरांच्या “पिकली पाने’ या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली.अरे मनमोहना, मराठी असे आमुची, माझी बेगम आली, सांगा मुकुंद कुणी हा, ही त्यांची गाणी लोकप्रिय झाली. 28 जुलै, 1977 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.