गुढीपाडव्यावर करोनाचे सावट
पुणे – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारली जात असल्याने साखरेच्या गाठी, आंब्याची पाने, लिंबाचा पाला, गुढीसाठी बांबू, वस्त्र आणि अन्य साहित्याने बाजारपेठा सजतात. यावर्षी मात्र दुकानांमध्ये साहित्य असूनही त्याची विक्री करता येत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण, गुढीपाडव्यासाठी साहित्य ही गौण बाब आहे. नागरिकांनी अंत: करणाने पूजन करावे असे आवाहन पंडित वसंतराव गाडगीळ यांनी केले आहे.
गुढीच्या साहित्य खरेदीबरोबरच मुहूर्ताला नवीन वस्तूची खरेदी अनेक जण हौसेने करतात. यामध्ये फ्रीज, टीव्ही, मायको आदी घरगुती गोष्टी घेण्यासह नवीन गाडी, घर खरेदीकडेही नागरिकांचा कल असतो. यावर्षी मात्र नागरिकांच्या हौसेवर पाणी फिरले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरचे पदार्थ टाळण्यासाठी अनेकांनी घरीच गाठी करण्याला पसंती दर्शवली. गाठी, आंब्याचे डहाळे, लिंबाचा पाला आदीच्या खरेदीसाठी पाडव्याच्या आदल्या दिवशी दुपारी मंडईसह उपनगरांतील विविध परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. तर अनेक ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या गाठींचा भाव चांगलाच वधारला होता.
पूजेतील मूल्यांना सर्वांत जास्त महत्त्व
बुधवारी सकाळी सूर्योदयापासून म्हणजेच सकाळी 6.41 वाजल्यापासून दीड तास (साधारण सकाळी 8.15 वाजेपर्यंत) “ब्रह्मध्वज पूजन’ म्हणजेच गुढीचे पूजन करायचे आहे. त्यानंतर देवदर्शन घेऊन घरातील ज्येष्ठांना नमस्कार करायचा आहे, अशी माहिती पंडित वसंत गाडगीळ यांनी दिली.
यंदा करोनाच्या सावटामुळे गुढीच्या प्रतिकात्मक पूजनाबाबत गाडगीळ म्हणाले, “प्रतिकात्मक पूजा ही तत्त्वाची पूजा आहे. पूजेतील मूल्यांना सर्वांत जास्त महत्त्व आहे. ब्रह्मध्वजाचे पूजन करताना मनापासून पूजन करणे, गरजेचे आहे. डोळे मिटून मानस पूजा करावी. गुढीपाडवा या युगारंभ दिन आहे. साहित्य गौण आहे. अंत: करणाने पूजन करावे, असेही पंडित वसंत गाडगीळ यांनी सांगितले.