-सावनी शेंडे, प्रख्यात गायिका
पंडितजींच्या गाण्यातलं माधुर्य बेमिसाल होतं. आपल्याकडे आजही अनेकांचा असा समज आहे की, शास्रीय संगीत हे रुक्ष असतं. पण जसराजजींनी आपल्या मधुर आवाजानं हा समज खोडून काढला. अत्यंत सुंदर बंदिशी, त्यांचं तितकंच माधुर्यपूर्ण सादरीकरण यामुळे प्रत्येक बंदिशीचा अर्थ कळायचा. आज संगीतासाठी, कलेसाठी आयुष्य वेचणारी, एकेक क्षण खर्ची घालणारी माणसं हळूहळू लोप पावत आहेत. अशा काळात पंडित जसराज यांचं जाणं हे मोठी आणि खरोखरीच कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण करणारं आहे.
यंदाचं वर्ष हे आघातांचं वर्ष म्हणून इतिहासात नोंदलं जाईल. किंबहुना त्यामुळे ते आयुष्याच्या डायरीतून डिलिट व्हायला हवं असं वाटू लागलं आहे. एकीकडे करोना विषाणूच्या संसर्गाचा आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे; तर दुसरीकडे अनेक प्रख्यात व्यक्तिमत्त्वं काळाच्या पडद्याआड जात आहेत. एकामागोमाग येणाऱ्या या निधनवार्तांची भीतीछाया मनात घर करून राहिलेली असतानाच काल सायंकाळी दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाचं वृत्त आलं. त्या धक्क्यातून सावरते न सावरते तोच शास्रीय संगीतातील आमचं दैवत असणारे पंडित जसराज यांनी जगाचा निरोप घेतल्याची बातमी कानी आली.
जीवनचक्राचा भाग म्हणून मृत्यू अटळ आहे, तो कुणालाही चुकलेला नाही, हे मान्य. पण पंडितजींसारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्याला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेलं आहे, ही जाणीव मनाला अतीव वेदना देणारी आहे. शास्रीय संगीतातील आमचं दैवत म्हणजे पंडित जसराज. ते गेल्यानं देव्हारा रिता झाल्याची भावना मनात आहे.
काही दिवसांपूर्वीच मी त्यांच्या मुलीसाठी सादरीकरण केलं होतं. त्यावेळी करोनाच्या महाभयंकर संकटाविषयी आमचं बोलणंही झालं होतं आणि लवकरात लवकर आपण सर्वच जण यातून बाहेर पडू, असा विश्वास पंडितजींनी जागवला होता. किंबहुना, तो आपल्यासाठी आशीर्वाद होता असं मी मानते. अशा पार्श्वभूमीवर आज त्यांनाच नियती घेऊन गेली आहे. त्यांच्या जाण्यानं शास्रीय संगीतातील एक अमूल्य हिरा लोपला आहे. आज शास्रीय गायकीमध्ये एखादी तान चुकीची आहे, बरोबर आहे हे अधिकारवाणीनं सांगणारे खूप कमी जण उरले आहेत. त्यामध्ये पंडितजी अग्रणी होते.
अगदी लहानपणापासून त्यांच्या आणि त्यांच्या अवीट सुरावटींच्या सान्निध्यात, त्यांच्या आशीर्वादात मी राहिले आहे. मी खूप भाग्यवान आहे, कारण दहावीत असताना त्यांच्या नावानं मला “पंडित जसराज गौरव पुरस्कार’ मिळाला. 2008 मध्ये त्यांच्या हस्ते माझ्या “हृदयस्वर’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पदोपदी पंडितजींनी नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या कौतुकाचे शब्द आजही माझ्या कानी गुंजत आहेत. “सावनी तू आपलं संगीत पुढं घेऊन जात आहेस, याचा मला खूप अभिमान वाटतो’ असं ते म्हणाले होते. मी त्यावर म्हणाले होते, “पंडितजी, तुम्ही या क्षेत्रात इतकं करून ठेवलं आहे की येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ती शिदोरी ठरणार आहे. आम्ही फक्त त्या पायवाटेवरून पुढं जात आहोत.’
तरीही त्यावर ते म्हणाले की, “ते चालण्याची तुझी क्षमता आहे याचं मला कौतुक आहे आणि आपल्या भारताचं नाव तू रोशन कर, हे संगीत नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचव, माझा तुला आशीर्वाद आहे.’ त्यांच्या निधनाची वार्ता ऐकली आणि चटकन ते आशीर्वादाचे हात आणि बोल आठवले. अशा असंख्य आठवणी मनात रुंजी घालत आहेत.
पंडितजींना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला. संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीत सृष्टीला त्यांनी योगदान दिले. पंडितजींचे वडील पंडित मोतिराम हेसुद्धा शास्त्रीय संगीताचीच आराधना करणारे गायक होते. त्यांची परंपरा जसराजजींनी केवळ पुढे चालवलीच नाही, तर तिला एक आगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. संगीतामध्ये आपलं स्वतंत्र स्थान त्यांनी निर्माण केलं. आपला असा खास रसिकवर्ग तयार केला आणि वर्षानुवर्षे निरामय आनंदाचं सुरेल दान त्यांनी आपल्या गायकीनं रसिकांच्या पदरात टाकलं. बंदिशीतील शब्दांबाबत ते पुढं विस्तारानं सांगायचे. त्यामुळे कलाकारांबरोबरच श्रोत्यांचं ज्ञानही समृद्ध व्हायचं. हा प्रकार बहुधा पंडितजींपासून सुरू झाला असावा.
शास्रीय संगीतही तितकंच रंजक आणि मनोरंजक असतं, ऐकायला सुश्राव्य, गोड, मधुर असतं हे त्यांनी श्रोत्यांना जाणवून दिलं. लीलया फिरणारा त्यांचा तिन्ही सप्तकातला आवाज, जितका आलाप गोड तितक्या ताना आक्रमक हा जो समतोल त्यांनी बांधला तो केवळ विलक्षण व दुर्मिळ असा होता.
पंडितजी पुण्यात शिवाजीनगरला चितळ्यांकडे राहायला यायचे. सौ. चितळेंना ते आईसमान मानायचे. त्यामुळे लहानपणापासून मला त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या असंख्य मैफिली मी जवळून, अगदी रंगमंचाच्या खाली बसून ऐकल्या आहेत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मी त्या ऐकत आले आहे. सुरुवातीला मला फारसं कळत नव्हतं. पण जसजसं मी शास्रीय संगीत शिकत गेले तसतसं त्यांच्या बंदिशी ऐकण्यातली गोडी वाढत गेली. त्यांच्या रागांमध्ये वेगळं काय आहे, हे पाहत गेले. पंडित जसराज यांनी श्रीकृष्णावर शेकडो भजने गायली आहेत. ती ऐकणं ही एक अविस्मरणीय पर्वणी असायची. त्यांच्यामुळे आयुष्य समृद्ध होत गेलं.
“हृदयस्वर’ या माझ्या स्वरचित बंदिशींचं पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदाच नाव आलं ते म्हणजे पंडित जसराज. कारण नव्या पिढीनं या क्षेत्रात पुढं यावं यासाठी ते सदैव प्रोत्साहन देत राहिले. आमचा जो काळ होता तो सुवर्ण काळ होता, नव्या पिढीमध्ये फारसं कौशल्य नाही अशा विचारांचा लवलेशही त्यांच्यात नव्हता. ते नव्या पिढीबाबत सकारात्मक असायचे.
मी प्रकाशन समारंभाच्या आमंत्रणाबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला तेव्हा क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले, “अच्छा तुमने बनायी है बंदिशी, मैं जरुर आऊँगा’.’ त्यांनी जराही अटी-शर्ती घातल्या नाहीत किंवा मला ऐकवून दाखव असं म्हटलं नाही. “मी येतोय’ हेच ठामपणानं त्यांनी सांगितलं. तरीही पुण्यामध्ये ते आले होते तेव्हा त्यांना त्या बंदिशी ऐकवल्या. त्यांनी अत्यंत मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि “इसी राह पे चलते रहो’ असा आशीर्वाद दिला.
त्यांनी दिलेली मूल्यं, विचार, शिकवण यांची जपणूक करणं, त्यांनी घालून दिलेल्या मापदंडांनुसार चालणं ही नव्या पिढीची जबाबदारी आहे. रियाज कसा असावा, अचूकता किती असावी, सच्चे गाणे कसे असावे, समर्पित भावानं कसं गावं अशा असंख्य गोष्टी पंडित जसराज यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. यासाठी सखोल परिश्रम घेण्याची तळमळ, उर्मी बाळगून वाटचाल करणं हीच या हिमालयाला श्रद्धांजली ठरेल!
(शब्दांकन : हेमचंद्र फडके)