शिंदे वासुली -पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय…’ आणि “ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषाने श्री संत तुकारामांची तपोभूमी, साक्षात्कार भूमी असलेल्या श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर दुमदुमला होता.
वारकरी सांप्रदायात श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची आषाढी वारी सोहळा रद्द झाला. आणि सर्वसामान्य, शेतकरी, वारकरी, माळकरी भाविकजण परंपरागत चालू असलेल्या पंढरपूरच्या आनंदमय सोहळ्याला आनंदावर विरजण पडले होते. मात्र, येथील काही भाविकांनी आपली वारकरी सांप्रदायाची परंपरा जपण्यासाठी सलग 19 ते 20 दिवस दररोज 15 किलोमीटर प्रदक्षिणा घालून पंढरपूरची पायी वारीची परंपरा जपली.
बुधवारी (दि. 1) आषाढी एकादशी निमित्त भामचंद्र डोंगर पंचक्रोशीतील वारकरी व स्थानिक नागरिकांनी विठूरायाचे दर्शन घेऊन आपला संकल्प पूर्ण केला. प्रदक्षिणा पायी वारीमध्ये भामचंद्र डोंगर पंचक्रोशीतील वारकरी साधक, स्थानिक महिला-पुरुष मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात काही मोजक्या भाविकांनी दिंडी काढली होती.
यावेळी सर्व भाविकांनी पांडुरंगाची आरती करून विठुरायाचे दर्शन घेतले. अजून पंधरा दिवस ही प्रदक्षिणा वारी ज्ञानोबा तुकोबाची पालखी पंढरपूरहून देहू-आळंदीत परत येईपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले.