कोल्हापूर, दि. 10 – कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर विषय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी निधीचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
जिल्ह्याच्या विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 16 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक विधान भवन येथे होत आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ, पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कामांची सद्यस्थिती. जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांचा आढावा.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपासाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करुन देणे, प्रलंबित अर्ज, वीज जोडणीसाठी प्राप्त अर्ज व वीज जोडणी दिलेल्या अर्जांची संख्या, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणारी घरे, उद्दिष्ट व साद्य, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, आरोग्य सुविधा व राष्ट्रीय कार्यक्रम, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिवभोजन योजना, महानगरपालिकेचे महत्वाचे प्रश्न या विषयांवर याबैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.