दुष्काळ हटला मात्र पदरी निराशाच : शेतात पिकवलेलं जातंय औषधाच्या दुकानात
शशिकांत भालेकर
पारनेर – गतवर्षी पाऊस चांगला होऊनही बदलत्या हवामानामुळे पिके धोक्यात आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला असून, कधी दुष्काळ, कधी हवामानाशी शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तो आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी शासन स्तरावर उपाय योजना होणे गरजेचे आहे.
पारनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये ओळखला जातो. यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला. पाऊस चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये विविध पिके घेतली. यामध्ये कांदा, वाटाणा, गहू, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांचा समावेश होता. मात्र यावर्षी हवामानामध्ये सारखा बदल होत असल्याने पिकावर अनेक रोग पडत होते. या रोगातून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक प्रकारच्या औषधांची फवारणी केली. मात्र लाखो रुपये औषधात घालून देखील पीक वाया गेले.
तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये कांदा घेतला जातो. परंतु या कालावधीमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे कांद्याच्या पिकावर शेतकऱ्याला पाणी सोडून द्यावे लागले. काही भागात कांदा आला. परंतु उत्पादन निम्म्याने घटले आहे. तालुक्यात यावर्षी गव्हाची दुबार, तिबार पेरणी करावी लागली. तरी देखील गव्हाचे पीक कमकुवत आहे. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने उत्पादन कमी निघणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी या गव्हाला पाळ्या घातल्या आहेत. ज्वारीची अवस्थाही तशीच आहे. पाऊस चांगला असल्यामुळे ज्वारीची लवकर पेरणी करण्यात आली. मात्र मर्यादित कालावधी उलटूनही ज्वारी काढणीला आली नाही. त्यावर चिकटा, मावा यांसारखे रोग पडल्याने कणसे काळी पडली. त्यामुळे उत्पादनात देखील घट होणार आहे.
बदलते हवामान, नेहमी ढगाळ वातावरण, अचानक पडत असणारे धुके या सर्वांचा परिणाम शेतमालावर होत आहे. शेतामध्ये असणाऱ्या सर्वच मालावर सध्या रोगराई पसरली असून, विविध प्रकारची औषधे या मालावर फवारली असून, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. मात्र गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शेतकऱ्यांनी कर्ज काढत शेतात भांडवल गुंतवले. मात्र यावर्षी हवामान पिकाला पोषक नसल्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. फळबागांची अवस्था दयनिय झाली आहे. अनेकांनी डाळिंबाच्या फळबागा काढून टाकल्या. मात्र ज्या शिल्लक आहेत, त्यांची फळ धारणा करण्यास शेतकऱ्यांना परवडत नाही. मका पिकावर लष्करी अळी पडली आहे. ही मका जनावरांना घातल्यावर ती दगावली आहेत. त्यामुळे या वर्षी शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.
रोगराईने उत्पन्नात झाली घट
यावर्षी पाण्याचा सर्वत्र सुकाळ आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालावर रोगराई झाल्याने शेतीचे उत्पन्न घटले आहे. तसेच उत्पादन खर्चामध्ये औषधांचा खर्च वाढत आहे. अनेक वेळा रोगांना औषध लागू पडत नसल्याने जास्त प्रमाणात औषध फवारे करावे लागतात. त्यामुळे जो पैसा कमावला आहे, तो औषधांवर खर्च होत आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या गर्दी जोरात आहे.