पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. या दोन्ही पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिर परिसरामध्ये 50 व्यक्तींनाच जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान उद्या (दि.12) तर आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान शनिवारी (दि.13) प्रस्थान होणार आहे.
श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान करत असतात. या दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानासाठी जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांची परवानगी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिलेल्या सूचना व आदेशानुसार सामाजिक अंतर राखून तसेच पालखी सोहळा प्रस्थानासाठी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. मंदिर परिसरात स्वच्छता व निर्जंतुकीकरण आदी नियमांचे पालन करून या दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी मंदिर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे.
राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यंदाचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका हवाई मार्गे अथवा रस्ते मार्गे पंढरपूरला नेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. दशमीच्या दिवशी या दोन्ही पालख्या पंढरपुर येथे पोहचणार आहे. पालख्या हवाई मार्गे की रस्ते मार्ग पंढरपूर येथे नेण्याचा निर्णय हवामानाचा अंदाज घेऊन घेण्यात येणार आहे.
करोना रोखण्यासाठी प्रशासनाने केलेली उपाययोजना वारकऱ्यांनी मान्य केली असली तरी दर्शनाची आस मात्र अस्वस्थ करीत आहे.