पालघर : भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे. ते काल डहाणू न्यायालयात पालघर हत्याकांडात मृत्यू झालेल्या साधूंच्या पक्षात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी येत होते. दरम्यान, सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या सोबत प्रवास करणारी त्यांची सहकारी गंभीर जखमी झाली आहे. त्रिवेदी हे (एम एच 04 एच एम 1704 क्रमांकाच्या) कारने येत असताना कारवरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उलटली.
दरम्यान, गडचिंचले हत्याकांड प्रकरणी आरोपींची संख्या आता 141 झाली आहे. त्यातील 9 अल्पवयीन आरोपींच्या संख्येत आता 1 ने भर पडली आहे. एकूण 10 जण आता भिवंडी येथील बाल सुधार गृहात आहेत. आज खूनाच्या 6 नव्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 19 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आधीच अटकेत असलेल्या 106 जणांपैकी 5 जणांना न्यायालयाने 16 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली असून, उर्वरीत 101 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले असले तरी त्यातील 40 जणांना तिसऱ्या गुन्ह्यात (आरोपींना अटक करताना हल्ला करणे) अटक करण्यात आली असून त्यांना 18 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्या शिवाय 19 आरोपी आधीच पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहेत.