नवी दिल्ली: पालघर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात दोन साधूंसह तिघा व्यक्तींची जमावाकडून झालेल्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि एनआयएकडे द्यावा, अशी मागणी करणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
या याचिकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीनंतर न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोन याचिकांपैकी एक याचिका श्री पंचदर्शन जुना आखाडा आणि हत्या झालेल्या साधूंच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे. या प्रकरणाचा राज्य पोलिसांकडून केला जात असलेला तपास एकांगीपणे केला जात असल्याचा आरोप केला आहे आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. तर घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निश्चित केली आहे. एप्रिल महिन्याच्या 16 तारखेला लॉकडाऊन लागू असताना कांदिवली येथे झालेल्या या घटनेमध्ये गडचिंचिले गावातील जमावाने पोलिसांच्या उपस्थितीत केलेल्या मारहाणीमध्ये तिघाजणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन साधूंचा समावेश होता. हे तिघे सूरतला एका अंत्यविधीसाठी जात होते.