चेन्नई – तमिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या गटात मोठीच हमरीतुमरी सुरू असल्याचे सांगण्यात येत होते.
पण आता मात्र या दोन गटांमध्ये समझोता झाला असून विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी हेच येत्या निवडणुकीतील अद्रमुक पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी केली आहे.
पक्षाच्या मुख्यालयात आज झालेल्या एका भरगच्च पत्रकार परिषदेत पनीरसेल्वम यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा मला विश्वास आहे.
पक्षाच्या अध्यक्षीय मंडळाचे प्रमुख ई मधुसुदन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला आहे, अशी घोषणाही पनीरसेल्वम यांनी केली आहे. या अधिकृत घोषणेनंतर पक्षातील गटबाजी संपली असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.