कॉंग्रेस नेते कपील सिब्बल यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
नवी दिल्ली : पाकिस्तानचे दोन तुकडे फक्त कॉग्रेसनेच केले. मोदीजी हेही लोकांना सांगा, अशा शब्दात कॉंग्रेसने भाजपावर आज हल्लाबोल केला. विधानसभेच्या निवडणुकीत 370 कलम उठवल्याचा मुद्दा प्रचारात आणणच्या भाजपाच्या कृतीचीही कॉंग्रेसने खिल्ली उडवली.
मोदीजींना केवळ कलम 370 दिसते. त्यांना पाकिस्तानची फाळणी माहित नाही. ती कोणी केली माहित नाही. ती फक्त कॉंग्रेस होती, जीने पाकिस्तानच्या अंतर्गत भूभागाचे दोन तुकडे केले. त्यावेळी मोदीजी तुम्ही कोठे होतात? असा सवाल कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला. हरियाणातील लोकांना सांगा पाकिस्तानच्या भुमीचे तुकडे करणारी कॉंग्रेसच होती. ते कॉंग्रेसच्या काळातच झाले. कॉंग्रेसविषयी अभिमान बाळगा. पण हे करायचं धाडस तुमच्यात नाही, असे ते म्हणाले.
मोदींवर टीकेची झोड उठवत सिब्बल म्हणाले, नागरिकांना पोटभर अन्न, ठंचावलेले जीवनमान आणि सुधारित सार्वजनिक आरोग्य सेवा ही सरकारचीच जबाबदारी आहे, हे अधोरेखीत करणाऱ्या कलम 47 च्या अंमलबजावणीसाठी भाजपा सरकारने काय केले? हे मोदीजींनी सांगावे. तुमच्या डोक्यात तुम्ही संविधानिक कर्तव्य ठेवतच नाही. देशात जवळपास 93 टक्के मुलांना योग्य आहार मिळत नाही. आणि तुम्ही केवळ कलम 370 चे तुणतुणे वाजवताय. तुम्ही हे विधानसभा निवडणुकीसाठी करत आहात. पण लोकांच्या हालअपेष्टांचाही जरा संवेदनशीलपणे विचार करा.
जम्मू काश्मिरमध्ये गरीबीचा दर 10. 35 टक्के आहे. तर 17.5 टक्के महाराष्ट्रात, 11.16 टक्के हरियाणात 29. 43 टक्के उत्तर प्रदेशात आहे. तर हा तो मध्य प्रदेशात 31.65 टक्के आहे. बेरोजगारीचा दर काश्मिरात 5.3 आहे तर हरियाणात तो 28. 3 आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या घोटाळ्यात भाजपाच्या जवळ असणाऱ्या 12 संचालकांची सीबीआय किंवा इडीची चौकशी का झाली नाही. हेच कॉंग्रेसचे असते तर त्यांना तातडीने सीबीआयच्या कोठडीत घेतले असते. पंतप्रधानांनी पीएमच बॅंकेबाबत एकही शब्द का उच्चारला नाही, असे सवाल सिब्बल यांनी केले. ते म्हणाले, कलम 370 विसरा. पीएमसी बॅंकेच्या टाचा घासून मेलेल्या खातेदारांचा विचार करा. त्यांच्या सर्व ठेवी तातडीने परत मिळतील, असा शब्द पंतप्रधानांनी द्यायला हवा.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बॅंक आणि आशियाई विकास बॅंकेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आर्थिक मंदी असल्याचे सांगतात. त्यावर तुम्ही विश्वास ठेवायला तयार नाहीत. पियुष गोयल म्हणतात, आर्थिक मंदी नाही. नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी डाव्या विचारांचे आहेत. मग नाणेनिधी, जागतिक बॅंक, आशियाई बॅंक सारेच डाव्या विचारांचे आहेत? गेल्या तीन वर्षात अमेरिकेत बेकायदा घुसण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भारतीयांना अटक केलेल्यांची संख्या तिप्पट झाली आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की लोकांना खायला अन्न नाही. डॉक्टर्स आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिपायाची नोकरी करत आहेत, असाही हल्ला त्यांनी चढवला.
एनआरसी आणि कलम 370 हा तुमचा (भाजप) कार्यक्रम, पण तुम्ही गरीबांना दिलासा देत नाही. रोजगार निर्मिती करत नाही. तुम्ही खोट्याचेच राजकारण करत आहात. तुम्हाला देश आणि त्यातील जनतेचं काही देणंघेणं पडलेले नाही, असे ते म्हणाले.