लाहोर – पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने विराट कोहलीला पाठींबा दिला आहे. कोहली जागतिक दर्जाचा फलंदाज असून या अपयशी कालखंडातून तो लवकरच बाहेर येइल, असा विश्वासही बाबरने व्यक्त केला.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व राखले आहे आता गेल्या काही काळापासून त्याच्या धावा होत नसल्याने सातत्याने टीका होत आहे मात्र, टीकाकारांकडे लक्ष देण्यापेक्षा त्याने मानसिकरीत्या खंबीर राहात मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य लाभ घेतला तर तो पुन्हा एकदा यशाच्या मार्गावर वाटचाल करताना दिसेल, असेही बाबर म्हणाला.
रोहित शर्मांकडून देखील कोहलीची पाठराखण
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी कोहलीला भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे. आता पुढील काळात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा होत असून कोहली या स्पर्धेद्वारे निश्चितच भरात येईल. त्याच बॅटमधून मोठी खेळी साकार होईल व त्यावेळी त्याच्यावर टीका करणारेच त्याचे कौतुक करताना दिसतील, अशा शब्दात कर्णधार रोहित शर्मांने देखील कोहलीची पाठराखण केली आहे.
दरम्यान, कोहलीच्या बॅटने जवळपास गेल्या अडीच वर्षापासून शतक ठोकले नाही. इंग्लंड दौऱ्यावरही विराट कोहली आतापर्यंत अपयशी ठरला आहे. कसोटी आणि टी-20 मालिकेतील दोन्ही डावात कोहली फ्लॉप ठरला आहे. कोहलीने बर्मिंगहॅम आणि ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळले होते, परंतु दोन्ही वेळा मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. त्याने अनुक्रमे 1 आणि 11 धावा केल्या होत्या.