नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यावर्षी भारतात येण्याची शक्यता आहे. यंदा भारत शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीचे आयोजन करणार आहे.
आठ देशांच्या या जागतिक संघटनेचे भारत प्रथमच आयोजन करणार आहे. वर्षअखेरीस भारतात ही एससीओची बैठक होत आहे. भारतासह पाकिस्तान, रूस, कजाखकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, किर्गिस्तान आणि उझ्बेकिस्तान एससीओचे सदस्य आहेत.
एका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारत पोटोकॉलनुसार एससीओच्या बैठकीला पाकिस्तानला निमंत्रित करणार आहे. निमंत्रण स्वीकारायचे कि नाही हे पाकिस्तानवर अवलंबून असेल. मात्र भारत-पाकिस्तानचे संबंधाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान भारतात येण्याची शक्यता धुसर आहे. त्यांच्याजागी ते पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधीला पाठवू शकतात. सरकारच्या प्रमुखांसाठी असलेल्या एससीओ हेडसच्या बैठकीला काही देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहिल्याची सुद्धा उदहारणे आहेत.
दरम्यान, पुलवामा, काश्मीर मुद्यांवरून दोन्ही देशांमध्ये संबंध तणावपूर्ण आहेत. सीमेवरील पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक हरकतीला भारतीय सैन्याकडून तितकेच चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.