श्रीनगर : सुमारे 300 दहशतवादी त्यांच्या पाकिस्तानातील तळांवर भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली. भारतीय लष्कराने नौगाम क्षेत्रात घुसखोरीचा डाव शनिवारी उधळून लावला. त्यानंतर थोड्याच वेळात ही माहिती जाहीर करण्यात आली.
या चकमकीनंतर पत्रकारांशी बोलताना मेजर जनरल विरेंद्र वत्स म्हणाले, सीमेपलिकडे असणारे दहशतवाद्यांचे तळ खचाखच भरलेले आहेत. शेकडो दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या महितीनुार, भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी तयार केलेले तळ पूर्णत: भरलेले आहेत. त्याचा अंदाज लावता त्यांची संख्या 250 ते 300 च्या दरम्यान असू शकते.
दरम्यान, शनिवारी पहाटे नौगम क्षेत्रात कुंपण तोडून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. लष्कराला पाकिस्तानी चौक्यांवर काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर घुसखोरीचा हा प्रयत्न झाला. त्याला लष्कराने चोख प्रत्यूत्तर दिले. त्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला, असे मेजर जनरल वत्स यांनी सांगितले.
सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त केला. दोन एके रायफली, 12 भरलेली मॅगेझिन्स, एक पिस्तूल, हातबॉम्ब असे त्याचे स्वरूप आहे. भारतीय आणि पाकिस्तानी चलनातील दीड लाख रुपयांचे चलनही हस्तगत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठार केलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव इद्रिस भट असे आहे. तो पाकिस्तानात 2018 मध्ये गेला होता. तेथे त्याने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. दरम्यान, दुसऱ्या अतिरेक्याची ओळख पटवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.