श्रीनगर- सुरक्षा दलांना बदनाम करण्यासाठी चकामकीवेळी नागरिकांची ढाल करण्याचे नवे धोरण पाकिस्तानातील यंत्रणांनी आखले आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.
नागरिकांची मानवी ढाल करून सुरक्षा दलांशी लढल्याने एकूण होणारी हानी अधिक असते. त्यामुळे सुरक्षा दलांविषयी असंतोष निर्माण होतो. पण, हैदरपोरा येथे झालेल्या चकामकीत ते दिसून आले. आम्ही हा कट हाणून पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक कारवाईत नागरिकांचे प्राण वाचवणे हेच आमचे उद्दिष्ट असते. मात्र नागरिकांमागे लपून सुरक्षा दलावर गोळीबार करायचा हे नवे सूत्र त्यांनी आखले आहे, असे सिंग म्हणाले. पोलीस हवालदार रोहित चिब यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कुलगाव येथे झालेल्या चकमकीत बुधवारी चिब शाहिद झाले. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि दोन नागरिक जखमी झाले. पाकिस्तानी दहशतवादी बाबरला यमसदनी धाडले.
या चकमकीतही नागरिकांचा वापर दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी करायचा होता पण आमच्या शूर जवानांनी ते होऊ दिले नाही. या वर्षात 14 दहशतवाद्यांना कंठस्नान सुरक्षा दलांनी घातले. त्यात, सात पाकिस्तानी नागरिक होते असे ते म्हणाले.