आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा निर्णय
इस्लामाबाद -काश्मीरवर वाकडी नजर ठेवणाऱ्या पाकिस्तानच्या उठाठेवी थांबण्याची चिन्हे नाहीत. आता त्या देशाने काश्मीर मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने अलिकडेच धडक पाऊल उचलत जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने भारतविरोधी थयथयाट सुरू केला आहे. भारताच्या निर्णयाला विरोध दर्शवत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे रडगाणे गायला सुरूवात केली आहे. पाकिस्तानची विनंती आणि चीनचा आग्रह यामुळे काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. त्या बैठकीतून पाकिस्तानच्या हाती काहीच लागले नाही. उलट, कुणीच साथ न दिल्याने पाकिस्तानची फटफजिती झाली.
त्यामुळे आणखीच बिथरलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचे ठरवले आहे. त्याविषयीच्या निर्णयाला तत्वत: मान्यता देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी मंगळवारी दिली. जम्मू-काश्मीरशी संबंधित घडामोडी आमची अंतर्गत बाब असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने वास्तव स्वीकारावे, असेही भारताने सुनावले आहे. मात्र, पाकिस्तानला शहाणपण येत नसल्याचेच त्या देशाच्या हालचालींवरून दिसून येत आहे.