दुबई – पाकिस्तान क्रिकेट मंडळ बीसीसीआयच्या मतांवर विरोध व्यक्त करताना पाहिले की हसू येते. खरेतर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक वाटा बीसीसीआयकडून येतो व त्यातून आयसीसी प्रत्येक देशाला त्यांचा वाटा देते. असाच काही पैशांचा वाटा पाकिस्तान मंडळालाही मिळतो, म्हणजेच एक प्रकारे पाकच्या क्रिकेटपटूंना बीसीसीआयच पोसते, असे धक्कादायक विधान पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केले आहे.
आशिया करंडकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळत नाही. यावेळीही बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला येणार नाही, असे सांगितले होते.
सर्व परिस्थिती माहिती असूनही पाक मंडळ बीसीसीआयवर रोष व्यक्त करत होते. तुम्ही जर आमच्या देशात आशिया करंडक खेळण्यासाठी आला नाहीत तर आम्ही एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येणार नाही, अशा धमक्या देत होते. खरेतर पाकचा संघ त्या स्पर्धेत सहभागी झाला नाही तरीही बीसीसीआयला काही फरक पडणार नाही, असे अख्तर म्हणाला.
भारताकडून जो पैसा आयसीसीला मिळतो, त्यातील एक वाटा पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मिळतो आणि भारताच्या पैशांमधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना करारानुसार मानधन दिले जाते. म्हणजेच बीसीसीआयच पाकच्या क्रिकेटपटूंना पोसते. भारताकडून मिळणाऱ्या पैशांवर पाकिस्तानचे क्रिकेटर पोसले जातात. बीसीसीआय हे जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे.
भारतात क्रिकेट लोकप्रिय आहे आणि अनेक स्पर्धाही भारतात होत असतात. यातून बीसीसीआयला मोठा आर्थिक लाभ होतो. त्यामुळे बीसीसीआयकडून जो पैसा आयसीसीला येतो तो रेव्हेन्यू शेअरिंगअंतर्गत पाक मंडळाकडेही येतो, असेही अख्तरने म्हटले आहे.
भारतात होणारी एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार आहे. या स्पर्धेतून बीसीसीआय प्रचंड पैसे कमावेत. त्यामुळे आयसीसीलाही मोठी रक्कम मिळेल व संलग्न देशांनाही मोठा वाटा निळेल व पाक मंडळालाही लाभ होइल, असेही तो म्हणाला.
पाकिस्तानची बाजू वरचढ ..
एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा भारतात होत आहे. मात्र, त्याचेच दडपण भारतीय संघावर जास्त राहील. विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघ पाकिस्तानकडून एकदाही पराभूत झालेला नाही. मात्र, यंदा हा इतिहास पुसला जाईल. कारण दबाव यजमान भारतीय संघावर असेल. गेल्या काही सामन्यांतील भारतीय संघाचा खेळ पाहता पाकिस्तानचीच बाजू वरचढ राहील, असे मतही अख्तरने व्यक्त केले आहे.