मेलबर्न – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला रनमशिन म्हटले जाते, त्याने त्याची गुणवत्ताही अनेकदा सिद्ध केली आहे. मात्र, कोहलीच्या समकालीन क्रिकेटपटूंशी तुलना केली तर मला पाकिस्तानचा बाबर आझम कोहलीपेक्षाही जास्त सरस वाटतो, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू टॉम मुडी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील क्रिकेटपटूंची गेल्या अनेक वर्षांपासून तुलना केली गेली आहे. पूर्वी सुनील गावसकर महान का हनिफ महंमद, महंमद अजरुद्दीन की जावेद मियांदाद, सचिन तेंडुलकर का इंझमाम उल हक यांच्यातील तुलनेने तर वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले जात होते. आता त्यात कोहली व आझम यांची भर पडली आहे. सध्या जगभरात करोनाने कहर केला असल्याने तसेच अनेक देशांत लॉकडाऊन असल्याने अनेक खेळाडू आपापल्या घरातूनच विविध माध्यमांना ऑनलाइन मुलाखती देत आहेत. मुडी यांनीदेखील अशाच एका मुलाखतीत आपली मते मांडली आहेत.
कोहलीची फलंदाजी तर सगळेच पाहतात. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, संयम आहे, खेळपट्टीवर नांगर टाकून उभे राहून समोरच्या संघावर वर्चस्व राखण्याची देखील क्षमता आहे. पण मला विचाराल तर पाकिस्तानचा बाबर आझम मला जास्त सरस वाटतो. त्याच्याकडे सातत्य आहे. क्रिकेटबुकमधील सर्व फटके आहेत. फिरकीबरोबरच वेगवान गोलंदाजीवर आक्रमण करण्याची क्षमता आहे. आत्ता जरी कामगिरीच्या तसेच आकडेवारीच्या बाबतीत कोहली अव्वल दिसत असला तरी येत्या पाच वर्षांत आझम कोहलीलाही मागे टाकेल, असेही मुडी यांनी सांगितले.
आझम आत्ता नवेदित क्रिकेटपटू म्हणून गणला जातो. त्याच्या नावावर केवळ 26 कसोटी सामनेच आहेत. येत्या काळात तो आणखी सामने खेळून जास्त प्रगल्भ होईल त्यावेळी तो जगातील सर्वात श्रेष्ठ फलंदाज म्हणून नावारुपाला येईल. त्याची शैली, फटके मारण्याचे तंत्र कोहलीपेक्षाही जास्त चांगले आहे, असेही मुडी म्हणाले.