त्या देशाची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी 30 मेपर्यंत राहणार बंद
लाहोर -भारतातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाकिस्तानचे लक्ष लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो निकाल डोळ्यांसमोर ठेऊन पाकिस्तानने आपली हवाई हद्द 30 मेपर्यंत भारतीय विमानांसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने फेब्रुवारीत जम्मू-काश्मीरच्या पुलवामात भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून जैशचा अड्डा उद्धवस्त केला. त्यामुळे तंतरलेल्या पाकिस्तानने सर्व विमानांसाठी स्वत:ची हवाई हद्द बंद केली.
काही दिवसांनी पाकिस्तानने स्वत:ची हवाई हद्द इतर देशांसाठी खुली केली. मात्र, भारतीय विमानांसाठी ती बंदच ठेवण्यात आली आहे. त्या निर्णयाचा फेरआढावा घेण्यासाठी बुधवारी पाकिस्तानात बैठक झाली. मात्र, त्यात भारतातील निवडणूक निकालानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरले. भारतातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि भारतात नवे सरकार स्थापन होईपर्यंत तरी दोन्ही देशांमधील संबंधांत सुधारणा होण्याची चिन्हे नसल्याचा सूर त्या बैठकीत उमटला.