इस्लामाबाद/श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी मोठा दावा करत म्हटले आहे की, भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकतो. यामुळे पाकिस्तानने आपली सैन्य तैनाती मजबूत केली असून देश हाय अलर्टवर आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत आसिफ यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या सैन्याला बळकट केले आहे, कारण सध्याच्या परिस्थितीत हे आवश्यक आहे. काही रणनीतिक निर्णय घेण्यात आले आहेत.”
पाकिस्तानचा परमाणू हल्ल्याचा इशारा –
आसिफ यांनी परमाणू हथियारांच्या वापराबाबतही वक्तव्य केले. ते म्हणाले, “पाकिस्तान आपल्या परमाणू हथियारांचा वापर तेव्हाच करेल, जेव्हा आमच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण होईल.” त्यांनी भारताकडून वाढत्या आक्रमक वक्तव्यांचा आणि सैन्य हालचालींचा हवाला देत पाकिस्तान पूर्णपणे सतर्क असल्याचे नमूद केले. दुसरीकडे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना “धूळीत मिळवण्याची” शपथ घेतली आहे.
पहलगाम हल्ल्याचे पडसाद –
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसारण मेदानात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह 26 जण ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या काश्मीरमधील स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या संघटनेने घेतली. मात्र नंतर इन्कार केला. भारताने हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा आरोप केला आहे, तर पाकिस्तानने हे आरोप फेटाळत हल्ला ‘खोटा’ असल्याचा दावा केला आहे.
भारताने हल्ल्यानंतर कठोर पावले उचलली:
सिंधू जल करार स्थगित: भारताने 65 वर्षे जुना सिंधू जल करार स्थगित केला, ज्याला पाकिस्तानने ‘युद्धाची कृती’ संबोधले.
व्हिसा सेवा बंद: दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि हवाई, व्यापारी संबंध तोडले.
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय तपासाची मागणी –
ख्वाजा आसिफ यांनी पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी रशिया, चीन आणि पाश्चिमात्य देशांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय तपास समितीची स्थापना करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “या तपासातून भारताच्या आरोपांची सत्यता स्पष्ट होईल.” पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.
भारताने G20 देशांमधील काही राजदूतांना पहलगाम हल्ल्याबाबत माहिती दिली, तर 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर भारताविरोधी सामग्री प्रसारित केल्याबद्दल बंदी घातली. दुसरीकडे, पाकिस्तानने आपल्या रेल्वे यंत्रणा सैन्याच्या ताब्यात दिल्या असून, 130 परमाणू हथियारे भारताविरुद्ध तैनात असल्याचा इशारा दिला आहे.
सोशल मीडियावर संताप –
सोशल मीडियावर या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमकी सुरू आहेत. भारतातील अनेकांनी पाकिस्तानला “दहशतवादाचा कारखाना” संबोधले, तर पाकिस्तानी मीडियाने भारतावर “खोटे आरोप” केल्याचा दावा केला.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंध नव्या नीचांकावर गेले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ यांच्या “भारताचा हल्ला अटळ” या दाव्याने आणि भारताच्या आक्रमक पवित्र्याने युद्धाची शक्यता वाढली आहे. दोन्ही देशांच्या परमाणू शस्त्रास्त्रांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने मध्यस्थी करावी, अशी मागणी होत आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती कशी वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.