श्रीनगर -जम्मू-काश्मीरात सोमवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी दोन दिवसांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले आहे.
अनंतनाग जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना प्रथम शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये नासीर उर्फ शाहबाज उर्फ बाझ भाई हा पाकिस्तानी दहशतवादी आणि त्याचा साथीदार मारले गेले. ते जैश-ए-महंमद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचे सदस्य होते.
चकमकीवेळी दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एक स्थानिक महिलाही जखमी झाली. अनंतनागमधील घटनेच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात चकमक झडली. त्यामध्ये सुरक्षा दलांनी एका पाकिस्तानीसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचे सदस्य होते. त्यामुळे सलग दोन दिवस धडक कारवाया राबवून भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना जबर दणका दिला आहे.