इस्लामाबाद – पाकिस्तानमधील नवीन सरकारमुळे देशाचे तुकडे पडतील, असे भाकित माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी वर्तवले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ संतप्त झाले असून त्यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. इम्रान खान यांनी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप शरीफ यांनी केला आहे.
जर वर्तमान सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत, तर देशाचे तीन तुकडे होतील असे इम्रान खान यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. म्हणूनच आपण सरकारवर दबाव आणत असल्याचेही त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले. मात्र खान यांच्या या मुलाखतीवरून तुर्कीच्या दौऱ्यावर असलेले शेहबाझ शरीफ चांगलेच भडकले आहेत. खान यांनी देशाला धोका निर्माण केला आहे.
खान यांनी अशाप्रकारे देशाला धोका निर्माण करू नये, असेही शरीफ म्हणाले. इम्रान खान हे कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास अपात्र असल्याची टीकाही शरीफ यांनी केली आहे.
केवळ राजकारण करा. मात्र आपली मर्यादा ओलांडू नका आणि पाकिस्तानच्या विभाजनाबद्दल काही बोलू नका. अशा शब्दात शरीफ यांनी खान यांना सुनावले आहे.
वर्तमान सरकार जर दिवाळखोर झाले, तर सरकार किंवा लष्कर देखील पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून वाचवू शकणार नाही, असे इम्रान खान म्हणाले होते. जर देशाचे दिवाळे वाजले तर त्याचा सर्वाधिक फटका लष्कराला बसेल. जर यावेळी योग्य निर्णय घेतले गेले नाहीत, तर देशाला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात इम्रान खान यांनी आपली चिंता व्यक्त केली होती.