मुंबई – भारतामध्ये यंदाच्या वर्षी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयकडून पाकिस्तान क्रिकेट संघाला व्हिसा मिळवून देण्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाणार आहे. मात्र, पाकिस्तानी प्रेक्षक तसेच पत्रकार यांना व्हिसा देण्याबाबत बीसीसीआय केंद्र सरकारशी संपर्क साधणार आहे. या सर्व घडामोडींची माहिती बीसीसीआयने आयसीसीला दिलेली आहे.
पाकिस्तानच्या संघाला विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी व्हिसा मिळवून देण्याबाबत बीसीसीआय सर्व ते सहकार्य करेल. मात्र, त्यांचे प्रेक्षक व पत्रकार याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकते, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने याबाबत आयसीसीला एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या संघाबरोबरच चाहते, अधिकारी आणि पत्रकारांनाही भारताने व्हिसा द्यावा. तसेच याबाबतचे लेखी हमीपत्रही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला हवे आहे. पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यासाठी केंद्राशी संपर्क केला जाणार आहे, असे बीसीसीआयने सांगितले असले तरीही पाकिस्तानच्या चाहत्यांना तसेच पत्रकारांना व्हिसा मिळणार की नाही, याबाबत सध्यातरी काहीही सांगता येणार नाही, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
खेळाडूंना तर बीसीसीआयने व्हिसा देण्याचा कबूल केले आहे, पण आता पाकिस्तानच्या चाहत्यांनाही भारताचा व्हिसा देण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतामध्ये जर आम्हाला प्रवेश देण्यात येणार नसेल, तर हा विश्वचषक दुसरीकडे खेळवण्यात यावा, अशी भूमिका पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यावेळी भारताकडून आमच्या संघाला आणि चाहत्यांना व्हिसा मिळेल, याची हमीही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे मागितली होती. या गोष्टीवर अखेर बीसीसीआयने आपला निर्णय दिला आहे. बीसीसीआयने याबाबत आयसीसीबरोबर संवाद साधला आहे. या संवादामध्ये आम्ही पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतामध्ये येऊन विश्वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी व्हिसा मिळवून देण्यासाठी केंद्राच्या संपर्कात आहेत. मात्र, दोन्ही देशांमधील तणाव पाहता अंतिम निर्णय केंद्र सरकारच घेईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचा संघ भारतात येऊन टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये एकदाही पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतामध्ये आलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2012-13 पासून एकही क्रिकेटची मालिका झालेली नाही. त्याचबरोबर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्येही संधी देण्यात आलेली नाही. मात्र, विश्वकरंडक ही मोठी स्पर्धा असते आणि त्याचे आयोजन आयसीसी करते त्यामुळे जर यजमान देशाने एका संघाला जर व्हिसा दिला नाही तर स्पर्धा अन्यत्र आयोजित करण्याबाबत निर्णयही होऊ शकतो.
त्यामुळे बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचे समजत आहे. बीसीसीआयची 1 एप्रिलला एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या संघाला आगामी टी-20 विश्वकरंडक
स्पर्धेसाठी व्हिसा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष
भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा दौरा करायला भारतीय संघाला परवानगी दिली जात नाही. तसेच पाकिस्तानच्या संघानेही गेल्या अनेक वर्षांत भारताचा दौरा केलेला नाही. मात्र, हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. आता जर टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तान संघाला जर भारतात यायचे असेल तर त्यासाठी भारतातील केंद्र सरकार काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.