विमान कंपन्यांना मिळाला मोठा दिलासा
नवी दिल्ली : पाकिस्तानची हवाई हद्द तब्बल 140 दिवसांनंतर भारतासाठी खुली करण्यात आली आहे. बालाकोटमधील एअरस्ट्राईकनंतर ही हद्द बंद करण्यात आली होती. पाकिस्तान सिविल एव्हिएशन ऑथॉरिटीकडून एक नोटीस जारी करण्यात आली आहे. तात्काळ पाकिस्तानची हवाईहद्द खुली करण्यात आल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे एअर इंडियाला आणि अन्य विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची हवाई हद्द बंद केल्यानंतर एअर इंडियाला तब्बल 491 कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागले होते.
Pakistan Civil Aviation Authority issues notice to airmen (NOTAM), states “with immediate effect Pakistan airspace is open for all type of civil traffic on published ATS (air traffic service) routes”. pic.twitter.com/UMuOnK3WSg
— ANI (@ANI) July 16, 2019
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना जाण्यासाठी बंदी असल्यामुळे नवी दिल्ली ते अमेरिका अशा प्रवासासाठी दोन ते तीन तासांचा अतिरिक्त अवधी लागत होता. तसेच युरोपमध्ये जाण्यासाठीही दोन, अडीच तासांचा अतिरिक्त कालावधी लागत होता. परंतु आता पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय विमान कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअरस्ट्राईक करत बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विमानांना इंधन आणि इतर खर्चामुळे दररोज सहा कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागत होते.