रावळपिंडी : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी क्रिकेट सामना पावसाचा व्यत्यय आणि खराब हवामानामुळे अखेर अनिर्णित राहिला आहे. कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव ६ बाद ३०८ वर घोषित आणि पाकिस्तानच्या पहिल्या डावात २ बाद २५२ धावा इतकाच खेळ होऊ शकला. २००९ ला श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पाकच्या भूमीत कसोटीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण खेळ न झाल्यामुळं पाक क्रिकेट चाहत्यांची चांगलीच निराशा झाली.
The first Test ends in a draw, PAK 252/2 (70.0 Ov) Abid Ali 109*, Babar Azam 102* Vs SL 308/6d (Dhananjaya de Silva 102*) #PAKvSL pic.twitter.com/ugIsJycU2l
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 15, 2019
लंकेने कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, पण अंधूक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ६८.१ षटकानंतर थांबविण्यात आला. पावसामुळे दुस-या दिवशी १८.२ आणि तिस-या दिवशी ५.२ षटकांचा खेळ होऊ शकला. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या ६ बाद २८२ होती. त्यानंतर तिस-या दिवशी रात्रभर कोसळलेला पाऊस आणि खराब हवामान यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला.
मात्र पाचव्या दिवशी हवामान साफ झाल्यानंतर खेळ सुरू करण्यात आला. त्यानंतर, आज पाचव्या दिवशी ६ बाद २८२ वरून पुढे खेळताना श्रीलंकेने आपला पहिला डाव ६ बाद ३०८ वर घोषित केला. कालच्या नाबाद ८७ धावावरून पुढे खेळताना धनंजया डि सिल्वाने आज कारकिर्दीतील ६ वे शतक झळकावल. श्रीलंकेने डाव घोषित केला तेव्हा धनजया डि सिल्वा नाबाद १०२ आणि दिलरूवान परेरा नाबाद १६ धावांवर खेळत होता. श्रीलंकेकडून दिमुथ करूणारत्ने ५९, ओशदा फर्नांडो ४०, निरोशन डिकवेला ३३ आणि एजेलो मैथ्यूजने ३१ धावा केल्या.
पाकिस्तानकडून पहिल्या डावात गोलंदाजीत शाहीन अफरीदी आणि नसीम शाहने प्रत्येकी २ गडी बाद केले. मोहम्मद अब्बास आणि उस्मान खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात आबिद अलीच्या नाबाद १०९ आणि बाबर आजमच्या नाबाद १०२ धावांच्या खेळीच्या जोरावर पाचव्या दिवसअखेर ७० षटकात २ बाद २५२ धावा केल्या, आणि अखेर सामना अनिर्णित राहिला.