श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील अनेक सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. यात मोठी जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. जम्मू काश्मीरच्या गुजेर आणि उरी सेक्टरदरम्यान नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात पाच सुरक्षारक्षक आणि 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय सेनेने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचं देखील मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सेनेतील चार जवान आणि सीमा सुरक्षा दलातील एका जवान शहीद झाले आहेत. तसेच सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात माहिती देताना बीएसएफचे महानिरिक्षक राजेश मिश्रा यांनी सांगितले की, पाकिस्तानने गोळीबार केला, त्याला भारतीय जवानांनीही प्रत्यूत्तर दिले. भारताने दिलेल्या प्रत्यूत्तरात पाकिस्तानच्या अनेक सुरक्षा चौक्या उद्धवस्थ झाल्या आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत अनेकवेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील तीन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील इजमार्ग येथे सर्वात प्रथम शस्त्रसंधीचं करण्यात आलं. यानंतर काही मिनिटांनी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्येही गोळीबार करण्यात आला.
बारामुलाच्या उरी सेक्टरमध्येही पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक राकेश डोभाल शहीद झाले आहेत. तसेच पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान ऋषीकेश जोंधळे हेही शहीद झाले आहेत.