नवी दिल्ली -चीनी कुरापतींमुळे पाकिस्तानलाही भारतविरोधी कारवाया करण्यासाठी जोर आल्याचे सूचित होत आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत अतिरिक्त 20 हजार सैनिकांना तैनात केल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे.
चीनी आगळिकींमुळे पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत मागील सात आठवड्यांपासून तणावाची स्थिती आहे. अशातच कुरापतखोर मित्राशी हातमिळवणी करून पाकिस्तानकडूनही नापाक हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. लडाखच्या उत्तर भागालगत असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि गिलगिट-बाल्टीस्तानमध्ये पाकिस्तानने सैनिक धाडले आहेत. त्यातून भारताला दोन आघाड्यांवर गुंतवून ठेवण्याचा चीन आणि पाकिस्तानचा कावा असल्याचे संकेत मिळत आहेत.
मागील काही आठवड्यांत चीनी आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये विविध बैठका झाल्याची माहितीही गुप्तचरांना मिळाली आहे. एवढेच नव्हे तर, चीनी अधिकारी अल् बद्र या दहशतवादी संघटनेशी संपर्क ठेऊन आहेत. त्यामागे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवण्याचा कट असल्याचा अंदाज आहे. पाकिस्तानस्थित संघटना असणारी अल् बद्र तशी क्षीण झाली आहे. मात्र, त्या संघटनेला ताकद देण्याचा प्रयत्न चीन आणि पाकिस्तानकडून केला जात असल्याचे सूचित होत आहे.