जम्मू -पाकिस्तानने हेरगिरी करण्यासाठी पाठवल्याचा संशय असलेले एक कबुतर भारताच्या जाळ्यात आले. ते कबुतर रविवारी पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये आले. कठुआ जिल्ह्याच्या हिरानगर क्षेत्रातील ग्रामस्थांनी काहीसे वेगळे भासणारे कबुतर प्रसंगावधान दाखवून पकडले. ते कबुतर तातडीने स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
कबुतराच्या एका पायात रिंग अडकवण्यात आली होती. त्या रिंगवर सांकेतिक भाषेत संदेश लिहिण्यात आल्याचा अंदाज आहे. त्या संदेशात काही क्रमांक लिहिलेले आढळले. पाकिस्तानातून आलेल्या कबुतराचे प्रकरण सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने घेतले आहे. त्यातून सांकेतिक संदेशाची उकल करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. संबंधित कबुतर जाळ्यात आल्याने नापाक कारवायांवर प्रकाश पडण्याची शक्यता बळावली आहे.