इस्लामाबाद: नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत मारा करून सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करणाऱ्या पाकिस्तानने जुन्या सवयीप्रमाणे बुधवारी पुन्हा उलट्या बोंबा मारल्या. पाकिस्तानने शस्त्रसंधी भंगाच्या आगळिकींचा ठपका भारतावर ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना पाचारण केले.
भारतीय सशस्त्र दले सातत्याने एलओसी लगतच्या आमच्या नागरी भागांना लक्ष्य करतात. तशाप्रकारच्या घटनांमध्ये मागील दोन दिवसांत दोन पाकिस्तानी नागरिक मृत्युमुखी पडले, असा आकांडतांडव त्या देशाने केला. दोन्ही देशांत 2003 मध्ये शस्त्रसंधी करार झाला. मात्र, त्या कराराचा भंग करून पाकिस्तानी सैनिक वारंवार भारतीय हद्दीत मारा करतात. त्या माऱ्याला केवळ प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सशस्त्र दलांकडून अवलंबले जाते.