संयुक्त राष्ट्रे : काश्मीर प्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या हाती पुन्हा एकदा निराशा लागली असून संयुक्त राष्ट्रातही पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. काश्मीरमध्ये कथितरित्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा प्रस्ताव यूएनएचआरसीमध्ये आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न निष्फळ ठरला.
जिनेव्हामध्ये सुरू असलेल्या 42 व्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला प्रस्ताव पारित करून घेण्यासाठी अन्य देशांचे समर्थन मिळाले नाही. पाकिस्तानला गुरूवारीही आंतरराष्ट्रीय समुदायाकडून समर्थन मिळाले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. काश्मीरप्रश्नी समर्थन मिळवण्यासाठी पाकिस्तान अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहे. परंतु पाकिस्तानला तोंडावरच पडाव लागत आहे. दरम्यान, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनकडूनही (ओआयसी) पाकिस्तानला पाठिंबा मिळाला नाही. भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा मोठा विजय मानला जातो आहे.
यूएनएचआरसीमध्ये 47 देश सहभागी झाले आहेत. तसेच भारतानेही कठोरपणे आपली भूमिका मांडली आहे. अजय बिसारिया हे यूएनएचआरसीमध्ये भारताचे नेतृत्व करत आहेत. बिसारिया यांनी पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली होती.