काबूल: काबुलमध्ये अलीकडेच एका आयएसआयएसआयच्या दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. त्याच्या चौकशीदरम्यान या गोष्टींचा उलगडा झाला. पाकिस्तान आयएसआयएसला फंडिंग करते असे चौकशीतून समोर आले आहे. दहशत पसरविण्यासाठी त्यांना पाकिस्तानकडून हत्यारे पुरविण्यात येतात. याचे पुरावे आमच्याकडे आहेत असे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले आहे. अफगाणिस्तानमध्ये येत्या 28 सप्टेंबरला राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सलेह उमेदवार आहेत. ते अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुखही आहेत.
सलेह यांनी पुढे म्हटले आहे की, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट अर्थात इसिसचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविले, ते अगदी योग्यच झाले असून त्यामुले भारत सरकारला आता या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अन्य कोणाच्या परवानगीची वाट पहात बसावे लागणार नाही. अफगाणिस्तानचे भारतासोबत चांगले संबंध मोदी सरकारच्या काळात अधिकच सुधारल्याने पाकिस्तान त्याचा राग अफगाणिस्तानवर काढत असल्याचा आरोपही सलेह यांनी केला आहे.
जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत भाग आहे. त्यामुळे कलम 370 हटविण्याचा निर्णय भारताचा अंतर्गत विषय आहे. या मुद्यावर पाकिस्तानला आक्षेप घेण्याची गरज नव्हती. तसेच, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा प्रश्न घेऊन जाण्याला अर्थ नाही असा टोला सलेह यांनी पाकिस्तानला लगावला आहे. दहशतवादाचा रस्ता सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी तालिबानला ऑफर दिली मात्र त्यांनी इन्कार केला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, दहशतवादी निवडणूक लढवू शकत नाही आणि कोणतीही जागा जिंकू शकत नाहीत. त्यामुळे तालिबानला सक्रीय राजकारणात आणणे कठिण आहे.
अफगाणिस्तान भारताला खरा मित्र मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अफगाणिस्तानशी आणखी चांगले संबंध व्हावेत अशीच इच्छा आहे. भारतासोबतची मैत्री आणखी मजबूत व्हावी पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा अफगाणिस्तानशी जोडत आहे त्याचा आम्ही विरोध करतो. सैरभैर झालेला पाकिस्तान अफगाणिस्तानशी बदला घेण्याची भाषा करतो यालाच दहशतवाद म्हणतात.
– अमरुल्लाह सलेह, अफगाणिस्तानचे गृहमंत्री