नवी दिल्ली,- सीमेवर शांतता ठेवण्याच्या संदर्भात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाली आहे. डीजीएमओ स्तरावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही सहमती कधीपर्यंत कायम राहणार हे पाकिस्तानच्या वर्तणुकीवर पूर्णत: अवलंबून राहणार आहे. त्याला कारण विश्वासघाताची त्या देशाची पार्श्वभूमी.
भारत आणि पाकिस्तानात यापूर्वीही युध्दविरामाचे निर्णय घेण्यात आले आहे, तशी सहमतीही दोन्ही देशांत झाली आहे. मात्र असे असले तरी सीमेपलिकडून गोळीबार करण्याची आगळीक पाकने कायम केली आहे. कधी दहशतवाद्यांना घुसवण्याच्या प्रयत्नात तर कधी आपल्या कुरापतखोर स्वभावाला जागत त्या देशाकडून अगोचरपणा केला जातो. एकट्या 2020 या एका वर्षात पाकने युध्दबंदीचे तब्बल पाच हजार वेळा उल्लंघन करत गोळीबार केल्याची माहिती खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहात दिली आहे. 2019 या वर्षात युध्दबंदी उल्लंघनाच्या साडेतीन हजार घटना घडल्या होत्या. अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा अर्थातच सीमेवर अशांतता आणि तणाव निर्माण होतो.
याबाबत बोलताना संरक्षण तज्ञ म्हणतात की युध्दबंदीच्या सहमतीच्या या अशा घोषणा एक अत्यंत छोटे पाउल असते व ते फार थोड्या काळासाठी असते. मुळात पाकिस्तान हा काही विश्वासपात्र देशच नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.
संरक्षण तज्ञ राकेश सरीन म्हणाले की, सीमेवर किंवा राजकीय स्तरावरही असा कोणता विशेष बदलाव झालेला नाही. त्यामुळे ही सहमती फार काळ टिकेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते. गेल्या दोन दशकांत अनेक वेळा अशी सहमती झाली आहे व ती गुंडाळूनही ठेवण्यात आली आहे व त्या प्रत्येक वेळी पाकिस्तानच याला जबाबदार राहीला आहे. 2003 मध्ये ती झाली होती. त्यानंतर 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर वर्षभर सीमेवर अशांतता होती. 2012 नंतरच्या स्थितीचा विचार केला तर सतत तणावाचे आणि अस्वस्थतेचे वातावरण राहीले आहे. तसेच गोळीबाराच्या आणि कुरापती काढण्याच्या घटनांत वाढच झाल्याचे निदर्शनास येते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.