लाहोर – मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाली. मात्र त्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर पाकिस्तानकडून अद्यापही कठोर कारवाई होऊ शकलेली नाही.
या हल्ल्याला जबाबदार असलेल्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या 19 सदस्यांना पाकिस्तानने “मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकले. मात्र त्यांना पकडून त्यांच्यविरोधात कठोर कारवाई मात्र केली गेली नाही. यापैकी 7 जणांविरोधात पाकिस्तानमध्ये खटले सुरू आहेत. मात्र त्याचा निकाल अद्यापही लागलेला नाही.
मुंबईवरील हल्ल्यात 166 निरपराध नागरिक ठार झाले होते. तर 300 जण जखमी झाले होते. हा हल्ला करणाऱ्या 9 दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातले तर अजमल कसाब याला जिवंत पकडले होते.
“26/11’ला जबाबदार असलेल्या 19 “मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांचा ठावठिकाणाही पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेला मिळालेला नाही. त्यापैकी काही जण पाकिस्तानमध्येच लपून बसले आहेत तर अन्य दहशतवादी देशाबाहेर पळून गेले असल्याचे समजते आहे. मुंबईवर हल्ला करण्यासाठी ज्या बोटी वापरल्या गेल्या त्यातील सहकारी किंवा या हल्ल्यासाठीचे अर्थसहाय्य उभे करण्याचे काम या दहशतवाद्यांनी केले होते.
पॅरिसमधील टेरर फंडींग विरोधी कृती गट असलेल्या “फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ने पाकिस्तानला फेब्रुवारी 2021 पर्यंत “ग्रे लिस्ट’मध्येच कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यावर या 19 दहशतवाद्यांना “मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या यादीत टाकले गेले.
दहशतवाद्यांच्या नेटवर्कविरोधात कठोर कारवाई संदर्भात “एफएटीएफ’ने पाकिस्तानला 6 उद्दिष्टे दिली होती. त्यामध्ये जमात उद दावाचा म्होरक्या हाफिझ सईद आणि जैश ए मोहम्मद चा म्होरक्या मसूद अझहरवर कारवाईचे प्रमुख उद्दिष्ट दिले गेले होते.
पाकिस्तानातील प्रमुख तपास संस्था असलेल्या “फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ ने 2009 मध्येच 1,200 दहशतवाद्यांची यादी तयार केली होती. त्यातच या 19 जणांचाही समावेश होता.
26/ 11 चा खटला 2009 पासून रावळपिंडी / इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयात प्रलंबित आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद सध्या लाहोरच्या तुरुंगत आहे. त्याला “टेरर फंडिंग’ प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा झाली आहे.
सईदला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून अमेरिकेने त्याच्यावर 1 कोटी डॉलरचे बक्षिसही लावले आहे. लष्कर ए तोयबाचा कमांडर झकिउर रेहमान लखवी याला पाच वर्षांपूर्वी मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तो पाकिस्तानात भुमिगत होऊन पुन्हा दहशतवादी कृत्यांमध्ये सक्रिय झाला आहे.
अब्दुल वाजिद, मजहर इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहिद जमील रियाज, जमील अहमद आणि युनिस अंजुम या अन्य सहा आरोपींवर मुंबई हल्ल्याचा कट करणे, खुनाचा प्रयत्न, नियोजन करणे आणि अंमलात आणणे आरोप असून ते सध्या रावळपिंडीतील अदियाला तुरूंगात आहेत.
“मोस्ट वॉन्टेड’ 19 दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधणे हे “एफआयए’पुढील पहिले काम आहे. त्यामध्ये बोटीतील सदस्य आणि मुलतानचा अमजद खान याचाही समावेश आहे. त्यानेच अल हुसैनी आणि अल फौज या बोटी खरेदी केल्या होत्या. बहावलपूरचा शाहिद गफूर हा या बोटींचा कॅप्टन होता. फैसलाबाद येथील रहिवासी इफ्तिखार अली यांने व्हॉईस-ओवर इंटरनेट प्रोटोकॉल मिळवला होता.
साहिवालचा मोहम्मद उस्मान, लाहोरचा अतीक रहमान, हाफियाबादचा रियाज अहमद, गुजरानवालाचा मुहम्मद मुश्ताक, डीजी खानचा महंमद नईम, कराचीचा अब्दुल शकूर, मुल्हदचा मोहम्मद साबिर, रहिम यार खानचा शकील अहमद आणि बावळनगरमधील अब्दुल रहमान हे बोटींचे चालक होते.
याशिवाय रावळपिंडीच्या उस्मान झियाने हम्मद अमीन सादिक आणि शाहिद जमील रियाज यांच्या खात्यात एबीएल कराचीमध्ये 80,000 रुपये जमा केले होते. त्याच प्रमाणे अब्बास नासिर यांने 2,53,690 रुपये, जावेद इक्बाल आणि मुख्तार अहमद यांनी 1,86,430 आणि 2,98,047 रुपयेही जमा केले होते. अन्य काही जणांनी रियाजच्या खात्यात आणखी पैसे जमा केले. हे पैसे पुढे बोट खरेदीसाठी वापरले गेले.
भारतातील 24 साक्षीदारांना जबाब नोंदवण्यास व इतर पुरावे नोंदविण्याकरिता पाकिस्तानला पाठविण्यास भारताने नकार दिल्यानंतर या खटल्याची कार्यवाही ठप्प झाली आहे. भारताच्या सहकार्याशिवाय या खटल्याचे कामकाज पुढे सुरू होऊ शकणार नाही, असे “एफआयए’चे मुख्य सरकारी वकील चौधरी अझहर यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात या खटल्याचे काहीच काम झालेले नाही.