शाह महमूद कुरैशी यांचे जयशंकर यांना पत्र
इस्लामाबाद- पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहुन पुन्हा एकदा चर्चेची ऑफर दिली आहे. सर्व महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची गरज असून प्रादेशिक शांततेसाठी आपण कटीबद्ध राहण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदाची सूत्रे जयशंकर यांनी नुकतीच घेतली त्याबद्दल कुरैशी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती पुलवामा हल्ला आणि बालाकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर आणखीनच वाढली आहे. दोन्ही देशांमधील चर्चेची प्रक्रिया खूप आधीपासून थांबली आहे त्या पार्श्वभूमीवर शाह यांनी केलेल्या आवाहनाला महत्व आहे.
दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही अशी भारताची भूमिका आहे. पाकिस्तान जो पर्यंत दहशतवादाच्या विरोधात ठोस कारवाई करीत नाही तो पर्यंत पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही अशी भारताची भूमिका आहे.