परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची पाकिस्तानवर टीका
न्युयॉर्क : जम्मू-काश्मीरविषयीच्या मुद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जावून स्वत:ची नाचक्की करणाऱ्या पाकिस्तानचा भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताला पाकिस्तानसोबत बोलण्यात काहीच अडचण नाही, परंतु तिथल्या ‘दहशतवाद्यांशी’ बोलण्यात अडचण आहे. काश्मीर प्रश्नाला सोडवण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाला संपूर्ण उद्योग बनवले असल्याची टीका जयशंकर यांनी पाकिस्तानवर केली.
मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये एशिया सोसायटी कल्चरल ऑर्गनायझेशन कार्यक्रमादरम्यान एस. जयशंकर बोलत होते त्यावेळी त्यांनी पाकला खडेबोल सुनावले. जेव्हा भारताने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भारताच्या निर्णयाला पाकिस्तान आणि चीनने आक्षेप घेतला असल्याची आठवण यावेळी त्यांनी करून दिली. तसेच भारताला पाकिस्तानशी बोलण्यात काहीच अडचण नाही, परंतु आम्हाला ‘दहशतवाद्यांशी’ बोलण्यात अडचण असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाकिस्तान हा एक असा देश आहे ज्याने काश्मीरचा मुद्दा सोडवण्यासाठी दहशतवादाला उद्योग म्हणून निर्माण केला. तसेच हा उद्योग काश्मीरपेक्षा एक मोठा मुद्दा आहे आणि हा मुद्दा केवळ भारतासाठीच पाकिस्तानने निर्माण केला असल्याचे दिसत आहे. जम्मू-काश्मीरमधून विशेष दर्जा रद्द करण्याच्या भारताचा निर्णय योग्य ठरला आणि राज्यात तो यशस्वी झाला तर 70 वर्षांपासून पाकिस्तानने दहशतवादाचा जो उद्योग तयार करून ठेवला आहे त्याला मोठा हादरा बसू शकतो याची पाकिस्तानला भिती आहे त्यामुळे ते भारताला वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करत असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.