इस्लामाबाद – प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारताचे हवेतून हेरगिरी करणारे क्वाडकॉप्टर पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी सांगितले की भारताच्या या छोटेखानी हेलिकॉप्टर सदृश टेहेळणी यंत्राने खंजर सेक्टर येथे पाकिस्तानची सीमा ओलांडली होती.
ते पाकिस्तानी हद्दीत पाचशे मीटरपर्यंत आत शिरले होते. ते पाकिस्तानी लष्कराने पाडून टाकले. या वर्षात पाकिस्तानने भारताचे पाडलेले हे आठवे क्वाडकॉप्टर होते. गेल्या महिन्यात अशाच प्रकारची भारताची दोन क्वाडकॉप्टर पाडण्यात आली आहेत असा दावा त्यांनी केला. यातील एक 27 मे रोजी तर दुसरे 29 मे रोजी पाडण्यात आले आहे.
तथापि भारताने पाकिस्तानच्या मागचा दावा फेटाळून लावला आहे. भारतीय हवाईदलाने बालाकोटवर हवाई हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्यात अजून सुधारणा झालेली नाही. तशातच भारताने काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर या घटनांना महत्त्व आहे.