इस्लामाबाद – भारताने काश्मीर विषयात एकतर्फी निर्णय घेतल्याच्या कृत्याचा निषेध म्हणून आता पाकिस्तानने दिल्ली-लाहोर बससेवाही रद्द केली आहे. पाकने या आधीच दोन देशांच्या दरम्यान धावणारी समझोैता एक्स्प्रेसही रद्द केली आहे. अटलबिहारी सरकारच्या काळात ही बस सेवा 1999 साली पहिल्यांदा सुरू झाली होती.
पण सन 2001 साली संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारताने ती बंद केली होती. नंतर ती जुलै 2003 साली सुरू झाली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पाकिस्तानचे दूरसंचार मंत्री मुराद सईद यांनी सांगितले.
भारतातून आठवड्यातून तीन वेळा ही बस लाहोर कडे जात असे आणि तिकडून पाकिस्तान टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडूनही आठवड्यातून तीन वेळा या बसेस सोडल्या जात होत्या. शुक्रवार रात्रीनंतर पाकिस्तानने थर एक्स्प्रेस ही रेल्वेसेवाही बंद केली आहे.