इस्लामाबाद – भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी हद्दीतील तीन जण ठार झाल्यामुळे पाकिस्तान सरकारने आज भारतीय दुताला पाचारण करून त्यांना या प्रकरणात समज दिली. या संबंधात पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय लष्कराकडून प्रत्यक्ष ताबा रेषा आणि सीमारेषेवरून पाकिस्तानी हद्दीत सातत्याने गोळीबार केल जात असून त्यात सामान्य नागरीकांचीही मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे. त्यामुळे आम्ही भारताचे प्रतिनिधी अहलूवालिया यांना पाचारण करून भारतीय गोळीबाराचा त्यांच्याकडे निषेध नोंदवण्यात आला आहे.
यावेळी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने मे महिन्यात आत्तापर्यंत भारताकडून झालेल्या गोळीबाराचा तपशीलही जाहीर करण्यात आला. भारताने दोन्ही देशांमधील शस्त्रसंधी कराराचे पालन करावे आणि प्रक्षोभक हल्ले थांबवावेत अशी मागणीही त्या देशाच्या विदेश मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.