इस्लामाबाद – पाकव्याप्त काश्मीरबाबत भारताच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या प्रभारी राजदूताकडे आपली नाराजी नोंदवली. याआधी पीओकेमध्ये पाकिस्तानने घेतलेली निवडणूक हा निव्वळ देखावा असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले होते.
जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. पीओके हा भारताच्या जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग आहे. या भागावर पाकिस्तानने अतिक्रमण केले आहे. हा भाग पाकिस्तानने ताबडतोब मोकळा करावा.
पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सीपीईसी प्रकल्पासंदर्भात जम्मू काश्मीरचा उल्लेख करण्यात आला. यावरही भारताने जोरदार आक्षेप घेतला. पीओकेमध्ये सीपीईसी प्रकल्पाच्या कामाला भारताने विरोध केला. भारताच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला.
पीओकेमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. पण या निवडणुकीवर बहुसंख्य स्थानिकांनी बहिष्कार टाकला होता. यानंतरच भारताची प्रतिक्रिया आली.