इस्लामाबाद,- झुंडबळींसारख्या घटनांना रोखण्याचा निर्णय पाकिस्तानातील लष्कराने आणि नागरी नेत्यांनी घेतला आहे. सियालकोटमध्ये श्रीलंकेचे नागरिकाची जमावाकडून हत्या झाल्याच्या पार्श्वभुमीवर नागरी आणि लष्करी नेतृत्वाने याबाबतचा निर्धार व्यक्त केला आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये श्रीलंकेचा नागरिक प्रियांथा दियावर्दना यांच्या भीषण हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. देशातील कोणीही व्यक्ती अथवा संघटनेला कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाऊ नये. अशा स्वरुपाच्या कोणत्याही घटना सहन केल्या जाऊ नयेत, अशी भूमिका या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनी व्यक्त केली.
या बैठकीला माहिती मंत्री फवाद अहमद, गृह मंत्री शेख रशीद अहमद, लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ, पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार आणि वरिष्ठ लष्करी आणि नागरी अधिकारी उपस्थित होते.
अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्व समावेशक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल आणि अशा घटनेमागील सूत्रधारांना कठोर शिक्षा दिली जावी, असा निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला.