इस्लामाबाद – पाकिस्तानच्या लष्कराने पाकिस्तानचे सरकार आणि पोलिसांशी संबंधित कोणत्याही नागरी विषयांमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे, अन्यथा पाकिस्तानमध्ये कोणतेही ऐक्य अस्तित्वात राहणार नाही, असे जमियत उलेमा ए इस्लाम (फजलूर) चे प्रमुख मौलाना फजलूर रेहमान यांनी म्हटले आहे.
अलीकडच्या काळात कराचीमध्ये झालेल्या घटनांमधून पाकिस्तानच्या लष्कराचे पाकिस्तानमधील सर्व यंत्रणांवर मोठे नियंत्रण असल्याचेच दिसून येते आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये लष्कराचे एक मोठे एकत्रीकरण होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लष्कराचा एक कर्नल आहे. सरकारच्या प्रत्येक महत्त्वाच्या संघटनेमध्ये लष्कराचा एक मोठा अधिकारी नियुक्त आहे. त्यांच्यापुढे सरकारचे सर्व आयुक्त, महानिरीक्षक अगदी निष्प्रभ ठरत आहेत, असे रेहमान यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या लष्कराने देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि सरकारी यंत्रणांवरील नियंत्रण ताबडतोब काढून घ्यावे. लष्करी अधिकाऱ्यांनी सरकारशी संबंधित नागरी विषयांमध्ये अजिबात हस्तक्षेप करू नये अन्यथा देशात कोणत्याच पातळीवर ऐक्य राहणार नाही, असे रेहमान म्हणाले.
सिंध प्रांतातील बहुतेक सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी रजा घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही सूचना केली आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाज गटाचे नेते सफदार अवन यांना अटक झाल्यानंतर सिंध प्रांताचे पोलीस महानिरीक्षक मुश्ताक मेहर यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीनंतर या अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा घेतली आहे.
सफदार अवन यांच्याविरोधातील “एफआयआर’ दाखल करून घेण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांचे अपहरण केले गेले होते, असे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.