काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानचा तांडव सुरूच
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेवून स्वत: तोंडघशी पडला. दरम्यान. आता या सर्व अपमानानंतर पाकिस्तानने युद्धाची भाषा सुरू केली आहे. भारतासोबत युद्ध करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य सज्ज असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती, या बैठकीत काश्मीर संदर्भात अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
भारताच्या अंतर्गत मुद्यावरून पाकिस्तानमध्ये रोज नवीन खलबते सुरू झाली आहेत. त्यातच उच्चस्तरीय बैठक आयोजित करून काश्मीर प्रश्नासंबंधी अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी याविषयी माहिती दिली. काश्मीरबाबत विशेष समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात काश्मीर सेलची निर्मिती केली जाईल. याशिवाय जगभरातील पाकिस्तानी दूतावासांमध्ये काश्मीर डेस्क तयार केला जाईल, ज्यामुळे या प्रकरणी प्रभावीपणे तोडगा काढता येईल. तसेच, आम्ही याप्रश्नी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याबाबत देखील चर्चा केली असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी भारताला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य सीमेवर सज्ज असल्याचेही सांगण्यात आले.