म्हणे, भारताने आमच्या दोन शेतकऱ्यांना ठरवले दहशतवादी
इस्लामाबाद -भारतीय लष्कराने नुकतीच महत्त्वपूर्ण कारवाई करताना दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली. मात्र, त्या घडामोडीविषयी पाकिस्तानी लष्कराने हास्यास्पद आणि तितकाच अजब दावा केला आहे. भारताने आमच्या दोन शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवल्याचे त्या देशाने म्हटले आहे.
काश्मीर खोऱ्यात अधिकाधिक दहशतवादी घुसवण्याच्या पाकिस्तानी मनसुब्यांची पोलखोल अलिकडेच भारतीय लष्कराने केली. भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अटकेची माहिती दिली. ते दहशतवादी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्या कबुलीजबाबाचे दोन व्हिडीओही जारी करण्यात आले. त्यात त्यांनी पाकिस्तानी लष्कर आणि तोयबाकडून प्रशिक्षण मिळाल्याची माहिती दिली. त्या दहशतवाद्यांच्या कबुलीजबाबामुळे पाकिस्तानची गोची आणि नाचक्की झाली आहे.
त्यातून ते दहशतवादी नसून शेतकरी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने सुरू केला आहे. भारतीय लष्कराकडून बनावट कथा सादर केली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दोन शेतकरी गवत कापण्यासाठी गेले होते. त्यांनी अनावधानाने नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडली. त्यांना पकडून भारत दहशतवादी ठरवत आहे, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.