कुरापतींनी गाठला 16 वर्षांतील उच्चांक
सरासरी दिवसाला 9 वेळा भारतीय हद्दीत मारा
जम्मू : सरलेल्या वर्षात (2019) पाकिस्तानी सैनिकांनी तब्बल 3 हजार 289 वेळा शस्त्रसंधी भंग केला. त्यांनी भारतीय हद्दीत सरासरी दिवसाला 9 वेळा मारा केला. पाकिस्तानी कुरापतींचा तो 16 वर्षांतील उच्चांक ठरला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 2003 या वर्षी शस्त्रसंधी करार झाला. मात्र, पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीर सीमेलगत जोरदार गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करत तो करारच जणू मागील वर्षी मोडीत काढला.
भारताने मागील वर्षी ऑगस्टमध्ये धडक पाऊल उचलताना कलम 370 हटवले. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाला. त्या घडामोडीमुळे काश्मीरवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या पाकिस्तानचे पित्त आणखीच खवळले. त्यातून भारताच्या त्या निर्णयानंतर अवघ्या 5 महिन्यांच्या कालावधीत पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्रच आरंभले. त्यांनी 1 हजार 565 वेळी तशाप्रकारच्या आगळिकी केल्या. ऑक्टोबरमध्ये शस्त्रसंधी भंगाच्या सर्वांधिक 398 घटनांची नोंद झाली.
दिवंगत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदावर असताना भारत आणि पाकिस्तानमध्ये 26 नोव्हेंबरर 2003 या दिवशी शस्त्रसंधी करार झाला. त्यानंतर पुढील दोन वर्षे शस्त्रसंधी भंगाची एकही घटना घडली नाही. मात्र, 2006 मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी कुरापती सुरू करत 3 वेळा शस्त्रसंधी भंग केला. 2013 या वर्षी पाकिस्तानी कुरापतींच्या 347 घटना घडल्या. त्यानंतर मागील पाच ते सहा वर्षे पाकिस्तानी सैनिक अक्षरश: थैमान घालत आहेत. त्यांनी 2017 मध्ये 971 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. तर 2018 मध्ये तशाप्रकारच्या 2 हजार 936 घटना घडल्या.